Mon. Jun 23rd, 2025

Maharashtra Politics: मुंबई | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. कापूस, सोयाबीन आणि तुरीला हमीभाव मिळावा, तसेच धानाला बोनस जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आमदारांनी शेतकऱ्यांच्या वेशात आंदोलन केले.

“कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदारांनी हातात सोयाबीन व तुरीची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारच्या शेतमाल आयात-निर्यात धोरणावर टीका करताना म्हटले की, “हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे. त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. हे अन्यायकारक आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही.”

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तत्काळ धोरणात बदल करावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारला जाग येईपर्यंत आंदोलने सुरूच राहतील, असा इशाराही दिला.

या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *