Prajakt Tanpure : गेल्या महिन्यात राहुरीत महापुरुष पुतळा विटंबनाची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होते. या उपोषणाला आता स्थगिती देण्यात आली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
26 मार्च रोजी राहुरी शहरात दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले. हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय.
फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.