Eknath Shinde: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत 4 विमनामधून 520 पर्यटक मुंबईत परतले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री 1 वाजता स्टार एअरलाईन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. यातून 75 पर्यटकाना मुंबईत आणण्यात आले. तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून 370 पर्यटक मुंबईत परतले. हे विमान आज संध्याकाळी 7 वाजता तर दुसरे विमान अंदाजे 9 वाजता मुंबईत लँड झाले आहे. त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय आज रात्री 8 वाजता स्टार एअरलाईन्सचे अजून एक विमान मुंबईकडे झेपावले असून त्यातून अजून 75 प्रवासी रात्री उशीरा मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून 520 प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.