Dhangar Reservation : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर चोंडी गाव सज्ज होत असतानाच, याच गावात कीर्ती स्तंभाजवळ यशवंत सेनेने पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या दीर्घकालीन मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर व इतर कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
“शासनाने फक्त अहवाल स्वीकारून वेळ मारून नेली”
यशवंत सेनेने दोन वर्षांपूर्वीही आंदोलन छेडले होते. त्यावेळी राज्य सरकारने ‘शिंदे समिती’ची स्थापना करून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यासारखं केलं. समितीचा अहवालही स्वीकारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही, असा आरोप यशवंत सेनेच्या नेत्यांनी केला आहे.
“निवडणुकीपूर्वी आश्वासने, नंतर दुर्लक्ष”
बाळासाहेब जोडतले म्हणाले, “शासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा गाजवला. मात्र निवडणुका झाल्यानंतर आम्हाला विसरलं. आजही आमची मागणी तशीच प्रलंबित आहे. शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली.”
राजकीय उपस्थितीत आंदोलकांचा दबाव
शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितलं, “शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल, तर आम्ही जन्मगावात अहिल्यादेवींच्या चरणी सत्याग्रह करतोय. ही केवळ मागणी नाही, तर आमचा हक्क आहे.”
सरकारकडे अपेक्षेची नजर
यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंत वर्ष मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. 31 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल रमेश बैस यांची चोंडी येथे उपस्थिती निश्चित आहे. अशा वेळी सुरू झालेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
सरकारने या आंदोलकांच्या आवाजाकडे कितपत लक्ष दिलं जातं, आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक पावलं उचलली जातात का, याची उत्सुकता आता सर्वत्र आहे.