Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली.
हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.