Ajit Pawar: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे सांगली, बीड, यवतमाळ येथील विविध पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
सभासद नोंदणीसाठी काम करा असे आवाहन करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागतील. तीन वर्षे निवडणूका झालेल्या नाहीत. त्याचे कारण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. लवकरच निर्णय व्हावा असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. निवडणूक झाली तर अनेक घटकातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. लवकरात लवकर निवडणूका झाल्या तर नव्या चेहऱ्यांना व अनुभवी लोकांना संधी मिळू शकते असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतानाच माणसाशी नातं जोडणारा आणि शेतकर्यांशी नाळ जोडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून प्रत्येकांनी पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे असे सांगतानाच सर्वसामान्यांच्या पाठीशी पक्ष ठाम उभा राहिल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला.
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आठवणी सांगताना अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा ही जोडी सर्वसामान्यांच्या मनावर कशी कोरली गेली होती हे सांगितले.
जात-पात धर्म याला फाटा देत आणि जातीय सलोखा राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्या देशाचे काम सुरू आहे. या संविधानावरच आपला देश चालत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सांगलीसह इतर जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा पक्षात झालेला प्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा – सुनिल तटकरे
सांगली हा जिल्हा विचारवंतांचा असून या जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा पक्षात होत असलेला पक्षप्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ घडली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलीही अशा जिल्ह्याच्या पाठीमागे सरकारची ताकद उभी राहिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच सांगलीच्या एका वेगळ्याच पॅटर्नची ओळख आहे. मात्र आता आपल्याला सांगलीचा नवा पॅटर्न उभा करायचा असून तो तुम्ही उभा कराल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
सांगली, बीड जिल्ह्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले राजकीय शिलेदार आज आपल्या पक्षात येत आहेत याचा आनंदही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली, बीड, ठाणे जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, यवतमाळमधील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
सांगली जिल्हयातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौंडा रविपाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप, युवा मोर्चाचे ग्रामीण माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसगुडे, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे आदींसह शिराळा, खानापूर, पलूस, इस्लामपूर, जत, तासगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
याशिवाय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रमेश आडसकर, अंकुश इंगळे, भारत पिंगळे, सुनिल शिनगारे, निलकंठ भोसले, काकडे गुरुजी, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, गटनेते हरुण इनामदार, नगरसेवक अजहर इनामदार, राजू इनामदार, रेश्मा इनामदार, आशाताई कराड आदींसह असंख्य विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. याशिवाय कल्याण – डोंबिवलीतील प्रतिक वालिलकर, जय जेपाल, पवन वालिलकर, शालिक पाटील, सचिन पाटील, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सना मलिक, आमदार विजयसिंह पंडित, आमदार इद्रीस नायकवडी, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार संजय दौंड, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह सांगली, बीड, यवतमाळ, कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.