Rahul Jagtap : राजकीय व्याख्येत ‘काळ सगळ्यांचा असतो, पण वेळ कुणाचीही नसते’, याच उक्तीची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आहे. एकेकाळचे कट्टर विरोधक, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे दोघे आता एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. राजकारणातील हे नवे समीकरण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीत नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत जगताप यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे नागवडे पराभूत झाले आणि भाजपचे विक्रम पाचपुते आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर जगताप यांना राष्ट्रवादीकडून निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, नागवडे कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या हालचालींमुळे दोघांनीही पुन्हा एकत्र यायचे ठरवले आहे.
आज (,27 मे) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन, नंतर तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत जगताप व नागवडे यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. याच बैठकीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. येत्या काही तासांत ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फटका भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना बसण्याची शक्यता आहे. कारण श्रीगोंदा मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप-नागवडे यांच्या एकत्रित प्रभावामुळे भाजपला मोठं आव्हान निर्माण होणार आहे.
राजकारणात काहीही अशक्य नसतं, कालचे शत्रू आजचे मित्र ठरतात, हेच या घडामोडींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.