Ravindra Chavan : राज्याचे मंत्री नितेश राणे एका धर्माबद्दल तर तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे.
तर आता महायुती सरकारमधील मंत्री आणि नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून तोडगा काढतील, असे विधान भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.
ते भाजपच्या पश्चिम विदर्भाच्या संघटनात्मक बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या सूचना द्यायच्या असतील ते देतील व योग्य निर्णय घेतील असं रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका पूर्ण होतील असेही चव्हाण म्हणाले आहेत.
भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आज भाजपच्या पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठकीसाठी अकोल्यात आले होते. तर आजच्या अकोल्यातील संघटन बैठकीला पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा, खामगाव, पुसद,अचलपूर, अकोला ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण अशा संघटनदृष्ट्या 9 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला पश्चिम विदर्भातील भाजपचे मंत्री प्रा. अशोक उईके, खासदार अनुप धोत्रे, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह विभागातील आमदार आणि महत्त्वाचे 1200 पदाधिकारी उपस्थित होते. तर अकोल्याचे पालकमंत्री आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली आहे.
तर अकोल्यालगतच्या बाभूळगाव येथील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही बैठक पार पडली आहे.