Rohini Khadse : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे अशा बातम्या कालपरवा पासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. पण आपल्या भारतात ते घडले आहे तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, प्रत्येकांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे.
पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे ही शोकांतिका आहे असं त्या म्हणाल्या.