Sat. Jun 21st, 2025

DNA मराठी विशेष लेख

Election 2025: – “ज्या दिवशी तुम्ही मुलांचा, नातवांचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून मतदान कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्यातील तुमच्या पिढीला काहीतरी द्याल,” ही साधी पण खोल अर्थ सांगणारी भावना आजच्या समाजव्यवस्थेसमोर आरसा धरते.

देशात किंवा राज्यात निवडणुका जरी वारंवार येत असल्या, तरी ‘मतदान’ या घटकाचा खरी सामाजिक जबाबदारी म्हणून विचार फार कमी वेळा केला जातो.

आज जनतेने विचार करायची गरज आहे की, आपण केवळ जात, पंथ, पक्ष, किंवा तात्कालिक फायद्याच्या आधारावर मतदान करत आहोत का? की आपल्या पिढ्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा, आणि नैतिक अधिष्ठानाचा विचार करत आहोत?

आज समाजात वाढत चाललेला भ्रष्टाचार, टक्केवारीची रीत, आणि कंत्राटी साखळीतील माफियांची झोपमोड करणारी उपस्थिती, या सर्व गोष्टींचा थेट परिणाम आपण खात असलेल्या अन्नधान्यावर, पिण्याच्या पाण्यावर, आणि शेतीमालावर होत आहे.

शेतीमध्ये मारल्या जाणाऱ्या अतिरिक्त कीटकनाशकांपासून ते रासायनिक खतांपर्यंत, दूध आणि शीतपेयांतील रसायनांची मात्रा, आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतील अपायकारक घटक या सर्व गोष्टी आरोग्यास घातक ठरत आहेत आणि यामागील मूळ कारण म्हणजे नफेखोरीचा हव्यास आणि प्रशासकीय दुर्लक्ष.

आज हे निर्णय घेणारे अधिकारी, हे कायद्याचे रक्षक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडून दिले गेलेले लोकप्रतिनिधी हेच सर्व स्वतःच्या अपत्यांच्या भविष्यातील आरोग्याचा विसर पावले आहेत. आज ते भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात, सत्ता गाजवतात, ठेके वाटतात, नियम मोडतात… पण त्यांचेही मूल हीच विषारी फळे आणि विषारी अन्न आणि दुधाचे पदार्थ खाणार आहे, हे वास्तव ते विसरत आहेत. म्हणूनच, एक नागरिक म्हणून, प्रत्येकाने विचार करावा

“माझ्या मुलांच्या आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्यासाठी मी कोणाला निवडतोय?” हा प्रश्न फक्त आजच्या राजकारणाला नाही, तर समाजाला प्रश्न विचारण्याची आणि सजग करण्याची एक नवी दिशा ठरतोय. मतदान म्हणजे केवळ बोटावर शाई लावणे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात कुठल्या प्रकारचं अन्न शिजणार आहे, हे ठरवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे.

“काय खावे राजकारण्यांनी ठरवायचं? का नागरिकांनी?”

देशात सध्या एक विचित्र आणि धोकादायक प्रवृत्ती वाढत चालली आहे “कोणत्या धर्माने काय खावे, कुणाच्या घरात काय शिजावे हे राजकारणी ठरवत आहेत!” एखाद्या देशाची ओळख ही त्याच्या विविधतेमुळे असते, त्याच्या खाद्यसंस्कृती, परंपरा, आणि व्यक्तिगत निवडींमुळे असते पण आज काही राजकारणी व्यक्तिशः पातळीवर जाऊन, धर्माच्या आधारावर ताटात काय असावे याचेही राजकारण करत आहेत.

धर्म, जात, परंपरा या प्रत्येकाचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र एखाद्या धर्माला धक्का लागतो म्हणून दुसऱ्या धर्मातील अन्नपदार्थावर बंदी घालणे, किंवा त्यास राजकीय मुद्दा बनवणे, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही.

दुर्दैव हे की, हेच लोक जेंव्हा प्रश्न येतो विषारी, भेसळयुक्त अन्न, रसायनांनी भरलेल्या पिकांचे, तेव्हा गप्प बसतात. ना ते कृषी कायदे काटेकोरपणे अंमलात आणतात, ना अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करतात, ना फूड सॅम्पलिंग किंवा गुणवत्तेच्या तपासण्या नियमित करतात.

साधा प्रश्न आहे “कोण काय खातो, याच्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हे का सांगितलं नाही की, तुम्ही जे खात आहात ते शुद्ध आहे की नाही?”

काहींना कोणती भाजी खावी हे सांगणाऱ्या नेत्यांनी कधीही हे सांगितले नाही की, त्या भाजीत किती किटकनाशक आहे. दूध पिण्याचा सल्ला देणाऱ्यांनी कधी तपासलं नाही की, ते दूध कोणत्या केमिकल्सने पातळ केलं गेलं आहे.

हे दुटप्पीपणं आता सर्वसामान्य जनतेनं ओळखलं पाहिजे. आज गरज आहे ती सजग मतदाराची, जो प्रतिनिधी निवडताना त्याच्या भूतकाळाचा, कार्यशैलीचा, आणि विचारसरणीचा अभ्यास करतो. धर्माच्या आणि ताटातल्या नावावर भांडण लावणारे नव्हे, तर

भविष्यात आपल्या घरात शुद्ध अन्न, स्वच्छ पाणी, आणि सुरक्षित जीवन मिळेल यासाठी आवाज उठवणारे प्रतिनिधी आपल्याला निवडायला हवेत.

कारण मतपेढ्या जिंकण्यासाठी पेटवले जाणारे हे विषय

उद्याच्या आपल्या पिढीच्या आरोग्यावर पडणाऱ्या परिणामांपासून लक्ष विचलित करणारे आहेत.

तर मग ठरवूया आपला प्रतिनिधी असा असावा जो “कोण खाल यावर नाही”, तर “कोण चांगलं खाईल यासाठी” लढा देईल.

जागरूक नागरिकत्वाची जाणीव करणारा विचार!

आपण ठरवूया – मतदान करताना ‘धर्म’, ‘जाती’, ‘भावना’ यांच्याऐवजी ‘स्वच्छता’, ‘सत्शासन’, ‘नैतिकता’ यांना महत्त्व द्यायचं. कारण भविष्यातील पिढीसाठी आपली हीच निवड आधारभूत ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *